जालन्यात वाळू माफियांचा धिंगाणा “तहसीलदारांना हायवाने चिरडण्याचा प्रयत्न.!
प्रशासनाला खुले आव्हान ; जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर

भोकरदन (जालना) : जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी आता पराकोटीला पोहोचली आहे. राजूर येथे अवैध वाळू वाहतूक पकडण्यासाठी गेलेल्या महसूल आणि पोलीस पथकावर १४ जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, माफिया एवढे मुजोर झाले आहेत की त्यांनी जाफराबादच्या तहसीलदारांचा मोबाईल हिसकावून घेत अधिकाऱ्यांच्या अंगावर हायवा घालून पळ काढला. या प्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
८ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजता सुमारास सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवनन यांना वाळू तस्करीची माहिती मिळाली. त्यानुसार तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे आणि जाफराबादचे प्रभारी तहसीलदार मंगेश साबळे यांच्यासह एक पथक साध्या खासगी गाडीने टेंभुर्णी रोडवर सापळा लावून थांबले होते. समोरून येणारी हायवा गाडी अडवली असता चालक आणि १०–१२ जणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
मोबाईल हिसकावला अन् जीवे मारण्याची धमकी
झटापटीदरम्यान तहसीलदार मंगेश साबळे यांनी संपर्कासाठी मोबाईल काढताच आरोपी विजय टोम्पे याने त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. यावेळी आरोपींनी “तुम्ही आमचं काही करू शकत नाही” अशा शब्दांत धमक्या दिल्या. इतक्यावरच न थांबता, दुसऱ्या चालकाने थेट महसूल पथकाच्या अंगावर हायवा घातला आणि घटनास्थळावरून पलायन केले. अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.
जिल्हाधिकाऱ्यांचा ‘अॅक्शन मोड’; MPDA कारवाईचे संकेत
या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी तातडीने गंभीर दखल घेतली आहे. हल्ल्यातील सहभागी व सराईत वाळू तस्करांवर MPDA (एमपीडीए) अंतर्गत तडीपारीची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, ९ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी एक हायवा जप्त करत गणेश सुरेश पालोदे याला अटक केली आहे. मात्र, मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.